रत्नागिरी: गर्दीचा फायदा घेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे राज्यमार्ग परिवहन महामंडळाला होणाऱ्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून विशेष पथकाद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांबरोबरच वाहकांची तपासणी केली जाते. मीना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कारवाईच्या भीतीमुळे फुकट्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या चार महिन्यात ३८ प्रवाशांकडून एकूण ९,१८३ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महामंडळाने तोटा कमी करण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून तपासणी पथकांकडून विविध मार्गांवर तपासणी केली जाते. यात फक्त विविध थांब्यांवरच नव्हे तर बस स्थानकातही तपासणी केली जाते. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देणाऱ्या वाहकांवरही कारवाई केली जात आहे.
कारवाईमुळे तिकीट काढून प्रवास
तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीटाच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम वसूल केली जाते. उदाहरणार्थ, तिकडची रक्कम ५० रुपये असल्यास १०० रुपये तसेच १८ टक्के जीएसटी रक्कम वसूल केली जाते. प्रवास दरम्यान सर्व प्रवाशांसमोर अपमानास्पद कारवाई होण्याची भीती असल्यामुळे प्रवासी आवर्जून तिकीट काढू लागले आहेत.



