चिपळूण (प्रतिनिधी)–: रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. जनता दरबाराचे आयोजन हे तीन टप्प्यात असणार आहे. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून यासाठी या जनता दरबारचे आयोजन आहे. नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे मंगळवार दिनांक २८ रोजी चिपळुणात येत आहेत. दुपारी १२ ते १.४५ वाजेपर्यंत खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रँड येथे असणार आहेत. नंतर दुपारी २ वाजता चिपळूण बहादूरशेख नाका येथील चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार भवन येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चिपळूण तालुक्यातील प्रश्न घेऊन नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती असणार आहे. नंतर चिपळूण येथील भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नंतर सायंकाळी ६ वाजता खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रँड येथे राखीव वेळ ठेवण्यात आली असून या हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार आहेत.
तर बुधवार दिनांक २९ रोजी सकाळी १०.३० वाजता परशुराम मंदीरात जाणार असून परशुराम देवाचे दर्शन घेणार आहेत. नंतर ते संगमेश्वर-देवरुखकडे रवाना होणार आहेत. दुपारी १२ वा. देवरुख- लक्ष्मी नरसिंहा मंगल कार्यालयात येथे देवरुख – संगमेश्वर तालुक्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी ११ वाजता डी.पी.डी.सी. सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केले आहे. या जनता दरबारामुळे जनतेच्या प्रलंबित प्रश्नांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.



