रत्नागिरी : जिल्ह्यात मद्याचा महापुर आला आहे, असे म्हटले तर विश्वास बसणार नाही, मात्र ही वस्तुस्थिती आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये थोडी थोडकी नाही तर जिल्ह्यातील तळिरामांनी १ कोटी १० लाख लिटर दारू रिचवली आहे. सर्वांत जास्त ५९ लाख लिटर ही निव्वळ बिअरचा खप झाला आहे. तर त्या खालोखाल विदेशी मद्य आणि वाईन आदीचा या विक्रमी खपामध्ये समावेश आहे.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्ष भरात विविध ठिकाणी धाडी टाकुन ३ हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये सुमारे २ कोटी ७५ लाखाचा मुद्दे माल जप्त केल्याची माहिती या विभागाने दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीवरून जिल्ह्यात मद्याचा प्रचंड खप झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या मद्याचा खप तब्बल १ कोटी १० लाख लिटरवर पोहोचला आहे. या विक्रमी खपाबरोबरच, बेकायदा मद्यविक्री आणि निर्मितीविरोधात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवायांमध्ये वर्षभरात ३ हजारांहून अधिक गुन्हे दाखल करून २ कोटी ७५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. या विक्रमी खपामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक ५९ लाख लिटर बिअरची विक्री झाली आहे. जी एकूण मद्यविक्रीच्या निम्म्याहून अधिक आहे. विदेशी मद्यालाही रत्नागिरीकरांनी पसंती दर्शवली असून ३४ लाख लिटर विदेशी मद्याची विक्री गेली आहे. याशिवाय २० लाख लिटर देशी मद्य आणि एक लाख लिटर वाईनचा खप झाला
आहे.
मद्याच्या या वाढत्या खपाबरोबरच अनधिकृत मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जोरदार मोहीम राबवली. वर्षभरात ३ हजारांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हातभट्टी दारूविरोधात या विभागाने कडक कारवाई करत सुमारे ४० हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. या सर्व कारवायांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ कोटी ७५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. यावरून उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची व्याप्ती दर्शवते. जिल्ह्यात मद्याचा वाढता खप आणि त्यासोबतच बेकायदा मद्यनिर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई हे दोन्ही पैलू समोर आले आहेत.



