रत्नागिरी : – महिला सशक्त झाल्यास समाजदेखील अधिक सक्षम होतो, असे उद्गार गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, आन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले.*
दापोली तालुक्यातील फणसू प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शिबीराचे उद्घाटन आज करण्यात आले.
प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कदम यावेळी म्हणाले, महिला सशक्त झाल्यास समाज अधिक सक्षम होतो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांना केवळ आरोग्यच नव्हे, तर शिक्षण व स्वयंपूर्णतेची दिशा देणे, हे आपले ध्येय आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य व सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या अभियानाद्वारे महिलांना शासनाच्या विविध योजना, हक्क व कायदेशीर संरक्षण याबाबत माहिती दिली जाणार आहे.
या अभियानाचे उद्दिष्ट महिलांच्या सशक्तीकरणासाठी आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन व सुरक्षितता याबाबत जनजागृती करणे आहे. या कार्यक्रमात महिला व बालकल्याण, आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि स्वावलंबन या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष शिबीर घेण्यात आले. यामध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी, रक्तगट तपासणी तसेच माता व बालकांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा समावेश होता.
कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



