रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरी ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी आपल्या तब्बल १५० निष्ठावान कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करत मनगटावर शिवबंधन बांधले. या मोठ्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात भर पडली आहे.कार्यक्रमाला पक्षाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांचे शिवबंधन बांधून उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि जल्लोषातून आपला उत्साह व्यक्त केला.
या प्रसंगी उपनेते बाळ माने यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जनतेच्या प्रश्नांसाठी, स्थानिक विकासासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी एकजुटीने लढण्याची हीच वेळ असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या विचारधारेबद्दल आणि जनआस्थेबद्दल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.या सामूहिक प्रवेशामुळे शहरात नवीन नेतृत्वाला बळ मिळत असल्याची भावना स्पष्टपणे जाणवत होती. पक्षाच्या कार्यात नव्या जोमाने काम करण्याची तयारी नव्या कार्यकर्त्यांनी दर्शवली. शहर विकास, सामाजिक प्रश्न आणि नागरिकांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शहरातील शिवसेना संघटन आज अधिक सक्षम, उत्साही आणि सज्ज झाल्याचे कार्यक्रमातून दिसून आले.



