रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून गेल्या सहा वर्षांपासून रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले ‘बसरा स्टार’ जहाज आता समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे दोन तुकड्यांत विभागले आहे. जहाजाला मध्यभागी मोठे भगदाड पडले असून, ते पूर्णपणे भंगार झाले आहे.
२०२० साली आलेल्या निसर्ग चक्रीवादळात ‘बसरा स्टार’ हे जहाज मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले होते. तेव्हापासून ते तेथेच अडकून पडले होते. हे जहाज काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डामार्फत जहाजाच्या मालकाला प्रशासनाकडून अनेकदा मुदतही देण्यात आली होती, मात्र ती मुदत उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे भंगारात गेलेले जहाज कसे काढायचे, हा प्रश्न प्रशासनासमोर होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे जहाज मिऱ्या किनाऱ्यावरील एक अनोखे पर्यटन केंद्र बनले होते. सोशल मीडियावर या जहाजाचे रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे दूरदूरवरून पर्यटक ते पाहण्यासाठी येत होते. यामुळे स्थानिक लोकांनाही तात्पुरता रोजगार मिळत होता. मात्र, आता खवळलेल्या समुद्राच्या जोरदार लाटांच्या माऱ्याने या जहाजाला मध्यभागी मोठे भगदाड पडले असून, त्याचे दोन तुकडे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार, सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा १२०० मीटरचा टप्पा अजूनही शिल्लक आहे. या कामात अडकून पडलेले ‘बसरा स्टार’ जहाज मोठा अडथळा ठरत होते. आता हे जहाज पूर्णपणे निकामी झाल्याने, तेथील बंधाऱ्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासन काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. समुद्राच्या रौद्र रूपापुढे मानवाने उभे केलेले हे बांधकाम किती काळ तग धरेल, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.