रत्नागिरी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी रत्नागिरी तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक शहरातल्या ‘काँग्रेस भुवन’ येथे पार पडणार आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह फुंकण्यासाठी आणि पक्षबांधणीला गती देण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस रमेश किर, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी समन्वयक सुरेश कातकर, जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद हे मान्यवर उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि इच्छुकांना आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत कशा प्रकारे सामोरे जायचे, यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी संवाद साधला जाण्याची शक्यता आहे. तसेच, तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, जनसंपर्क आणि बूथ कमिटींचे सक्षमीकरण या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.
“काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. तालुक्यातील सर्व निष्ठावान काँग्रेस प्रेमी आणि पदाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर यांनी केले आहे.



