रत्नागिरी : आठवडाबाजार संपल्यानंतर रात्रीच्या वेळी नगरपरिषदेकडून दोन घंटा गाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. एक घंटागाडी रस्त्यावर असेल तर दुसरी आठवडाबाजारातील आतल्या भागात असेल. प्रत्येक व्यावसायिकांनी आपापला कचरा घंटागाडीतच टाकायचा आहे. नगरपरिषदेकडून दोन वेळा याबाबत निरीक्षण करण्यात येणार आहे. तिसऱ्यावेळेपासून मात्र थेट कारवाईच केली जाईल असा इशारा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी शनिवारी (दि.३) आठवडा बाजार येथे भेट देवून पाहणी केली. व्यावसायिकांशी चर्चा करून स्वच्छतेबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेविका प्रिती सुर्वे, नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
रत्नागिरी बसस्थानकापासून विक्रेते माल विक्रीसाठी बसतात. मात्र विस्कळित दुकाने मांडत असल्याने नागरिकांना त्रास होतो. ग्राहकांना आपली वाहने लावून खरेदी करता यावी यासाठी विक्रेत्यांकरिता दुकाने लावण्यासाठी एक रेषा मारण्यात येणार असून त्या रेषेतच लावावीत. जेणेकरून ग्राहकांना वाहने लावून खरेदी करणे सुलभ होईल. ग्राहकांना वाहने लावण्यासाठीही नियोजन केले जाणार आहे. बाजार संपल्यानंतर विक्रेत्यांनी आपापला कचरा घंटागाडीत टाकूनच बाहेर पडायचे आहे. रत्नागिरी शहर सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी यावेळी केले.



