रत्नागिरी : हिंदू धर्मियांमध्ये अन्य प्रमुख सणांपैकी नवरात्रोत्सवास विशेष महत्व आहे. यावर्षीय शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार दि. २२ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवात भाविक उपवास ठेवतात, देवीची पूजा करतात. यानिमित्ताने दूर्गामातेची प्रतिष्ठापनासुध्दा केली जाते. जिल्ह्यात ४३६ सार्वजनिक व ६५ खासगी मिळून एकूण ५०१ दुर्गामातेची प्रतिष्ठाना केली जाणार आहे.
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. नऊ दिवसाच्या उत्सवाची सांगता दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात् दसऱ्याला होते. यावर्षी दि. २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. दि. २ आॅक्टोबर रोजी दसरा सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने नवरात्रोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांकडून मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून मूर्तीकारांकडूनही दूर्गामातेच्या मूर्तीचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ४३६ ठिकाणी सार्वजनिक, ६५ ठिकाणी खासगी दूर्गामूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी केवळ घटाची पूजा केली जाते. त्यामुळे ४२४ सार्वजनिक ठिकाणी घटस्थापना केली जाणार असून १९ हजार ३१५ ठिकाणी खासगी घट बसविण्यात येणार आहेत.
नवरात्रोत्सवात रंगाचेही विशेष महत्व आहे. प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे भाविक वेशभूषा करतात. याशिवाय नवरात्रात पदयात्रासुध्दा काढण्यात येत असल्याने त्याप्रमाणे भाविकांकडून नियोजन करण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवात दांडिया/गरबा नृत्यांचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी दांडिया स्पर्धासुध्दा आयोजित केल्या जात असल्याने दांडिया मंडळाचा सराव सुरू आहे. नवरात्रोत्सवात पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच दांडिया करता आवश्यक पोषाख, फॅन्सी दांडिया, इमिटीशन ज्वेलरी विक्रीसाठी उपलब्ध असून बाजारपेठ सजली आहे.



