रत्नागिरी: रत्नागिरीतील कुणबी समाजनेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि संजय गांधी निराधार योजना रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुनील नावले यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. येथील विविध सामाजिक कार्य, संघटन कार्यात सदैव अग्रणी असणारे हे व्यक्तीमत्व अचानक हरपल्याने साऱ्यांच्या मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पावस दशक्रोशीतील सुनील गोपाळ नावले (वय ५०, रा .पावस) एक सुस्वभावी, साधी राहणी असे हे व्यक्तीमत्व होते. कुणबी समाज संघटन असो किंवा येथील विविध सामाजिक कार्यात ते सदैव अग्रणी होते. सामाजिक कार्याबरोबरा राजकीय क्षेत्रात ते सद्या क्रियाशील होते. सोमवारी सकाळी कुणबी समाजेन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्यावतीने ते ओबीसी आरक्षण आंदोलनातही सहभागी झाले होते. हे आंदोलन आटोपून ते आपल्या रत्नागिरीतील निवासस्थानी गेलेले होते. दरम्यान येथील संघटना पदाधिकारी यांच्याशी सामाजिक कार्याबाबत संवाद साधून राहिले होते.
यादिवशी दुपारी निवासस्थानी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते तपासणीसाठी रिक्षाने रुग्णालयात येत होते. यादरम्यान ते अत्यवस्था झाल्याने रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. पण त्यावेळी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. त्यांच्या निधनाची खबर समाजातील पदाधिकाऱ्यांच्या कानावर गेली. सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे धाव घेतली. नावले यांचा निधनाच्या घटनेने साऱ्यांना धक्का बसला. सोमवारी आंदोलनादरम्यान सर्वांशी संवाद साधून असलेला सहकारी अचानक गमावल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
सुनील नावले यांनी मागील काळात रत्नागिरी पंचायत समिती उपसभापती पद भूषवले होते. पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते. संजय गांधी निराधार या योजनेसाठी रत्नागिरी तालुक्याच्या समितीवर पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने त्यांची 2023 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील समिती तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या पहिल्या सभेत त्यांनी एकूण 183 अर्जांना मंजुरी दिली होती. समाजातील गरजू, उपेक्षित घटनांना त्यामाध्यमातून न्याय देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड होती. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गरजू व्यक्तींना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले होते. एक आंबा बागायतदार म्हणूनही त्यांची ख्याती होती. अशा या समाजनेते, सामाजिक कार्यकर्त्याच्या निधनाने साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचा पशात पत्नी, दोन मुली, भाउ असा परिवार आहे.



