रत्नागिरी : पोलिस शिपाई आणि चालक अशा एकूण १०८ पदांसाठी रत्नागिरीनजिकच्या एमआयडीसी क्रीडा संकुल येथे १३ ते २२ फेब्रुवारी या कालावघीत भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी विविध जिल्ह्यांतून ६४७९ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. ही भरती पुर्णपणे पारदर्शकपणे आणि शासनाच्या नियमांच्या अधीन राहून होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये तसेच काेणत्याही चुकीच्या पद्धतीचा अवलंब करू नये, असे आढळल्यास गुन्हा दाखल होणार, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार पारिषदेत दिला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनीही उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे २०२४-२०२५ या वर्षासाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मिरजोळे एमआयडीसीतील क्रीडा संकुल येथील मैदानावर भरती प्रक्रिया होणार असल्याने हे मैदान सुसज्ज करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा वापर करू नये. डमीचा वापर केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. उमेदवारांनी लावलेले सुचना फलक आणि दिशादर्शक यांचा वापर करावा. उमेदवारांनी किंवा त्यांच्या पालकांनी नोकरीचे अमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे. भरतीसंदर्भात पैशांची मागणी केली किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा गैरप्रकार निदर्शनास आला, तर रत्नागिरी पोलिसांच्या ९३७१४१५६१२ या ‘रत्न सेतु’ व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर तक्रार नोंदवावी. किंवा रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) रत्नागिरी किंवा ठाणे येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनीवरून माहिती द्यावी. १०६४ हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध आहे. तक्रारदाराचे नाव गाेपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही यावेळी पोलिस अधीक्षक बगाटे यांनी दिली. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
…………….
ही भरती शिपाई १०० आणि चालकाची ८ पदे यासाठी होत असून यासाठी ६४७९ अर्ज आले आहेत. शिपाईसाठी १०२८ महिला आणि ३०८४ पुरूष उमेदवारांचे अर्ज आले आहेत. चालकांसाठी १३४ महिला आणि २,२३४ पुरूष उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
…………..
१३ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत पहाटे साडे पाच वाजल्यापासून भरतीला सुरूवात होणार आहे. यात कागदपत्रांची पडताळणी आणि मैदानी चाचणी होणार आहे. महिला आणि पुरूषांसाठी १०० मीटर आणि गोळाफके तसेच महिलांसाठी ८०० मीटर आणि पुरूषांसाठी १६०० मीटर धावणे ही शारिरिक चाचणी होणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी साडेपाचशेपेक्षा अधिक अंमलदार आणि ६० अधिकारी तैनात रहाणार आहेत.



