रत्नागिरी : पाेलिसांचे काम केबिनमध्ये बसून नाही तर रस्त्यावर असते. पाेलिसांची लाेकाभिमुखता आहे की, जास्तीत लाेकांमध्ये मिसळून ते काम करू शकतात. हे त्यांचे कर्तव्य आहे. आपण ऑफिसमध्ये बसून काम करणार नसून लाेकांमध्ये मिसळून काम करणार असल्याचे रत्नागिरीचे नूतन पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
त्यांनी सांगितले की, आपण सिंधुदुर्ग येथे काम केले आहे. त्यामुळे कोकण हे एकप्रकारे माझं दुसरं घर आहे. कोकणात येण्याची माझी तीव्र इच्छा होती. अखेर या ठिकाणी बदली झाल्याने मला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेसह पाेलिसांत लाेकाभिमुखताही वाढली पाहिजे आणि लाेकांमध्ये मिसळून करणारा मी आहे. पाेलिस शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि नम्र असावेत. त्यांनी लाेकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कोकणात अमली पदार्थांची तस्करी मोडीत काढणे हे माझे प्राधान्य असणार आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सायबर गुह्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. आपला पैसा जाऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. याबाबतही रिझल्ट देऊ, असेही त्यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टी अतिशय संवेदनशील मानली गेली होती. मच्छीमार बांधवांची सुरक्षा राखणे आमचे कर्तव्य आहे. ते आमचे कान आहेत. समुद्रकिनारी असणाऱ्या लँडिंग पॉइंवर विशेष सुरक्षा ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
———-
कर्णकर्कश सायलेन्सरवर कारवाई
कर्णकर्कश सायलेन्सरमुळे अपघात हाेण्याची, वयाेवृद्धांना त्रास हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे माेठ्या आवाजाचे सायलेन्सर वाहनचालकांनी स्वत:हून काढून टाकावते, अन्यथा कारवाई केली जाईल.
————-
– गोवा बनावटीची मद्य वाहतूक रोखण्यासाठी सीमेवर लक्ष ठेवणार
– घरात एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेवर लक्ष देणार




