गुहागर: उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणताच दिवस, वार, तिथी पाळत नाहीत. त्यांच्याकडे नेहमीच मांसाहारी जेवण असते आणि शिवसेनेच्या शिंदेंच्या मंत्र्यांचा श्रावण असेल म्हणून ते त्यांच्याकडे जेवणासाठी गेले नसावेत, असा मिश्किल टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी हाणला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला केवळ एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र शिंदे शिवसेनेचे एकही मंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये धुसफूस आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदार जाधव यांनी मिश्किल टोला हाणला आहे. अजित पवार यांच्यासोबत आपण पंधरा वर्षे काम केले आहे. ते नेहमी उत्तमोत्तम मांसाहारी जेवण खाऊ घालतात. मात्र सध्या श्रावण सुरू आहे हे त्यांच्या लक्षात नसावे. बहुदा म्हणूनच शिवसेनेचे मंत्री त्यांच्याकडे जेवायला गेले नसावेत असे भास्कर जाधव यांनी गुहागर येथे पत्रकारांशी बोलताना मिश्किलपणे सांगितले. भास्कर जाधव यांची पक्ष सोडून गेलेल्याबाबतची एक पोस्ट मंगळापासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल आपण कधीच वाईट बोलत नाही. मात्र जेव्हा आपल्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण अजिबात सोडत नाही, असेही ते म्हणाले. जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आहेत ते इतरांना आपल्या सोबत येण्याचा आग्रह करत आहे मात्र सोडून गेलेले लोक भावनिकतेला बळी पडले आहेत. अर्थात ०४ सोडून गेले तर ४० जण तयार करण्याची धमक अजूनही आपल्याकडे आहे आणि आपण ते करून दाखवू असे जाधव यांनी या व्हायरल पोस्ट बाबत सांगितले.



