रत्नागिरी : राष्ट्राची एकजूट, देशाभिमान व्यक्त करणे, सैन्याचे मनोबल वाढविणे आणि भारतीय सैन्याच्या पाठिशी एकजुटीने उभे राहण्यासाठी उद्या रविवार दि. ११ मे रोजी मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ काढण्यात येणार आहे. या रॕलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी केले आहे.
या रॕलीच्या नियोजनासंदर्भात एम आय डी सी च्या विश्रामगृहात आज पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. बैठकीस पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अधिष्ठाता डाॕ जयप्रकाश रामानंद, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, डाॕ अनिरुध्द आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डाॕ सामंत आढावा घेवून म्हणाले, आम्ही सर्वजण भारतीय सैन्यासोबत आहोत, हे एकजुटीने दाखवून देण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांची ही रॕली असणार आहे. झेंड्याप्रती, देशाप्रती सर्वांनी एकत्र यावे. सकाळी ७-३० वाजता सर्वांनी मारुती मंदिर येथे उपस्थित रहावे. यावेळी शहीद जवानांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री सूर्यवंशी यांनी यावेळी सर्व आढावा दिला.
विविध संघटनेचे, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

