चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ आणि पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी वाढती लोकसंख्या आणि वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १०७ कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव उड्डाणपुलाचा (Elevated Structure) प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे.
चिपळूण शहरातील तहसील कार्यालय ते पाग या दरम्यान उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या भागात एसटी बसेस आणि अवजड वाहनांमुळे अनेक प्राणघातक अपघात झाले आहेत. या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १८ जून २०२५ रोजी १०७.७८ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला. हा प्रस्ताव २२ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे पुढील मंजुरीसाठी सादर केला होता. वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश करण्याबाबत सुचवण्यात आले होते.
या प्रकल्पाची निकड ओळखून रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी थेट दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चिपळूणमधील वाहतूक कोंडी आणि अपघातांची भीषणता गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. पुलाच्या विस्तारीकरणामुळे शहरांतर्गत होणारी वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे योग्य विभाजन होऊन अपघात थांबण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही आराखडा तयार करण्यासाठी पाठपुरावा केल होता.
खासदार राणे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या कामाला गती देण्याचे संकेत दिले आहेत. साखळी क्रमांक ५१+५५० ते ५२+६२० या दरम्यान प्रस्तावित असलेल्या या उड्डाणपुलामुळे चिपळूणच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. सध्या या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित असून, केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रलंबित प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



