रत्नागिरी: शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ति जितेंद्र मयेकर हिच्या खून प्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तिघांनाही ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रियकर दुर्वास दर्शन पाटील ( जंगमवाडी, वाटद खंडाळा) याचासह बार मॅनेजर विश्वास पवार (कळझोंडी) आणि कारचालक सुशांत शांताराम नरळकर (आदर्शनगर, वाटद खंडाळा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीचा भाऊ हेमंत जितेंद्र मयेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भक्ती जितेंद्र मयेकर हिने तिच्या प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला होता मात्र प्रियकरांनी तिच्याशी ब्रेक अप करत अन्य एका मुलीशी लग्न जमविले होते. आपले ठरलेले लग्न मोडेल या भीतीने भक्तीचा काटा काढण्याचे प्रियकराने ठरविले. त्यानुसार त्याने १६ ऑगस्ट रोजी तिला खंडाळा येथील बार येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर तिचा केबलने गळा आवळून खून केला. ती निपचित पडल्यानंतर विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांच्या मदतीचा मृतदेह आंबा घाटात नेऊन टाकला. अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील करीत आहेत.
टॅटूमुळे पटली ओळख
तब्बल १४ दिवसांनी बेपत्ता भक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र तिच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे हा मृतदेह तिचा असल्याचे स्पष्ट झाले.
गरोदर असल्याची धक्कादायक माहिती
या खूनप्रकरणाचा तपास करताना तरुणी प्रेम संबंधातून गरोदर राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावल्यानेच तिचा अडसर दूर करण्यासाठी गळा आवळून मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे



