राजापूर: राजापूर चिंच बांध येथील अर्जुना नदीपात्रालगत असलेले सूर्य मंदिर वाचवण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसभेत प्रमुख वक्ते म्हणून मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे व स्वामी नरेंद्राचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. राजापूर येथील सूर्य मंदिराचा लढा या धर्मसभेच्या माध्यमातून तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सकल हिंदू समाजातर्फे प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी वेळी येथे सूर्य मंदिर नसण्याचा उल्लेख झाला होता. त्यामुळे हिंदू समाजाचा भावना दुखावल्या आहेत असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सकल हिंदू समाजाने चिंच बांध येथील पुरातन वास्तू ही सूर्य मंदिर असल्याचा निर्वाळा विविध पुराव्यांद्वारे दिला आहे. त्यासाठी लढा देणे आवश्यक असल्याने या धर्मसभेचे आयोजन केल्याचे पत्रकात म्हटले आहे. शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ही धर्मसभा होणार आहे. या धर्मसभेला आमदार किरण सामान उपस्थित राहणार असल्याची माहिती अभिजीत गुरव यांनी दिली आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी एका व्हिडिओद्वारे धर्मसभेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.



