रत्नागिरी शहरातील ‘दामले विद्यालय’ शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा दामले विद्यालयाचा निकाल अत्यंत विक्रमी आणि ऐतिहासिक लागला आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण शाळा आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या परीक्षेत इयत्ता पाचवीतील राज्य गुणवत्ता यादीत एक तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत ११ विद्यार्थी, तर इयत्ता आठवीच्या गुणवत्ता यादीत १० विद्यार्थी असे तब्बल २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
या सर्व गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी आज विद्यार्थ्यांना आकर्षक हार घालून त्यांची ‘मारुती मंदिर ते दामले शाळा’ अशी ढोल-ताशांच्या गजरत आणि वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गुणवत्ता यादीत झळकलेल्या या सर्व २१ शिलेदारांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



