रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जागतिक महत्त्वाच्या चवे-देवूड येथील कातळशिल्पांना (पेट्रोग्लिफ्स) राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. यावेळी लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या समवेत त्यांनी परिसराची पाहणी करत कातळशिल्पांच्या संवर्धन, संरक्षण आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा केली. तसेच पर्यटकांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या **’सोव्हीनियर शॉप’ (भेटवस्तू केंद्र) चे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आमदार प्रमोद जठार, प्रशांत यादव, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड तसेच विविध विभागांचे अधिकारी, तज्ज्ञ आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
साठहून अधिक खोदचित्रांचा अनमोल वारसा
चवे-देवूड येथील कातळशिल्पांमध्ये सुमारे १५ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद खडकावर कोरलेल्या साठहून अधिक खोदचित्रांचा अद्वितीय ठेवा आहे. यामध्ये आक्रमक पवित्र्यातील एकशिंगी गेंडा, झेप घेणारे हरीण, मार्जार कुळातील प्राणी, लांब पिसारा असलेला मोर, तरस, उंचावलेल्या शेपटीचे माकड, मानवी पावलांसारख्या आकृत्या, शिंगांच्या रचना आणि विविध अमूर्त चित्रांचा समावेश आहे. या चित्रांमधून तत्कालीन जैवविविधता, वन्यजीवन आणि आदिमानवाची निरीक्षणशक्ती स्पष्टपणे दिसून येते.
मानवी इतिहासाचा जिवंत पुरावा
ही कातळशिल्पे केवळ पुरातत्त्वीय नव्हे तर कलात्मक, पर्यावरणीय आणि मानववंशशास्त्रीय अभ्यासासाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनशैलीचे, त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचे आणि सांस्कृतिक वारशाचे हे जिवंत दस्तऐवज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
संवर्धन आणि पर्यटन विकासाला गती
पाहणीदरम्यान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जागतिक वारसा असलेल्या या कातळशिल्पांचे दीर्घकालीन संवर्धन, वैज्ञानिक पद्धतीने संरक्षण, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, माहिती केंद्र, मार्गदर्शक व्यवस्था आणि परिसराचा पर्यटन विकास याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
आमदार किरण सामंत यांनीही या ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी शासनामार्फत आवश्यक निधी, मूलभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका व्यक्त केली. कोकणातील या अमूल्य वारशाला जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळावी आणि स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन सकारात्मक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
चवे-देवूड येथील कातळशिल्पे ही रत्नागिरी जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख असून त्यांचे संवर्धन आणि विकास हा कोकणच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.



