भारतीय डाक विभाग हे केंद्र सरकारचे सुमारे 176 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेले खाते असून, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारी विश्वासार्ह संस्था म्हणून त्याची ओळख आहे. बदलत्या काळानुसार आणि ग्राहकांच्या अपेक्षांनुसार डाक विभागाने आपल्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करत विविध व्यवसायाभिमुख सेवा सुरू केल्या आहेत.
ई-कॉमर्स आणि पार्सल व्यवसायाच्या वाढत्या युगात पोस्ट ऑफिस दरवर्षी लाखो पार्सलची यशस्वी हाताळणी करत आहे. आज पार्सल सेवांच्या क्षेत्रात अनेक खासगी स्पर्धक असले तरी भारतीय डाक विभागाने आपल्या विश्वासार्हता, व्यापक नेटवर्क आणि ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर स्वतंत्र ओळख कायम राखली आहे.
ग्राहकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत आणि काळाची गरज ओळखून रत्नागिरी डाक विभागाने दिनांक १ जून २०२६ पासून ‘फ्री पिकअप’ सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी विशेष वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून ते रत्नागिरी शहर तसेच एमआयडीसी परिसरात फिरून ग्राहकांकडून त्यांच्या पार्सल व पत्रांचे संकलन करणार आहे.
या सुविधेमुळे ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये येऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार असून व्यावसायिक ग्राहकांना अधिक सुलभ व जलद सेवा मिळणार आहे.
तसेच, ग्राहकांनी BNPL (Book Now Pay Later) करार केल्यास अशा प्रकारच्या विशेष सुविधांचा अधिक लाभ घेता येणार असून व्यवसायिक ग्राहकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
रत्नागिरी डाक विभागाच्या या ग्राहकाभिमुख उपक्रमाचे नागरिक व व्यावसायिक वर्गाकडून स्वागत करण्यात येत असून, या अभिनव सेवेबद्दल ग्राहकांनी श्री. ज्ञानेश कुलकर्णी, अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग व विपणन अधिकारी श्रीगजाननकरमरकर, रवींद्र घडशी तसेच पोस्टमास्तर रत्नागिरी व हेड पोस्टमन रत्नागिरी प्रधान डाकघर यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.



