रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम “सुवर्ण अविष्कार” अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रंगमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळ अध्यक्ष श्री.महेश नाईक, उपप्राचार्य श्री.सुनील गोसावी, श्री. दिलीपकुमार शिंगाडे, आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक श्री. वैभव कानिटकर रंगमंचावर उपस्थित होते. कला अभिव्यक्ती आणि आठवणींचा उत्सव ठरलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना जुन्या आठवणींमध्ये रमवले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रीतम तुकाराम बनप यांच्या “देखाना हायरे सोचाना” आणि “छुकर मेरे मन को” या गीतांनी झाली. त्यानंतर रत्नेश कांबळे यांनी प्रेमकविता सादर करून रसिकांची मने जिंकली. नितीन गजानन मिरकर यांनी “मी हाय कोली” हे गीत सादर करत कोकणी रंगत वाढवली.
ममता पंडित यांनी सादर केलेल्या मूक अभिनयाने प्रेक्षकांना वेगळाच अनुभव दिला. श्री. सुदेश निवळकर यांनी “दो दिल मिल रहे है” हे गाणे सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. श्री. दुर्गेश आखाडे यांनी एकपात्री नाट्यकला सादर करून आपल्या अभिनयाची छाप पाडली, तर ज्योती मोरे यांनी “नच ले नच ले मेरे” या गाण्यावर नृत्य सादर करत कार्यक्रमात जल्लोष निर्माण केला.
या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश नाईक आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक वैभव कानिटकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाने माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ केले.



