रत्नागिरी: एसटी महामंडळाने लागू केलेला अन्यायकारक ‘स्वच्छता अधिभार’, भाडेवाढ आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी जिल्हावतीने आज एसटी प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला. जिल्हा प्रमुख श्री. दत्ता कदम यांच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत आणि पदाधिकाऱ्यांनी आज एसटी विभागाला मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रमुख मागण्या आणि आक्षेप:
*अन्यायकारक स्वच्छता कर*: प्रत्येक तिकिटावर २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. स्थानके स्वच्छ ठेवणे ही महामंडळाची जबाबदारी असून त्याचा आर्थिक भार प्रवाशांवर लादणे चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
*ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय*: १५ एप्रिलपासून लागू झालेल्या दरवाढीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासावर गदा आली आहे. ही सवलत कोणतीही अट न ठेवता पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*मूलभूत सुविधांचा बोजवारा*: १०% भाडेवाढ करूनही स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी नाही, बसेसची अवस्था दयनीय आहे आणि गाड्या वेळेवर सुटत नाहीत. सुविधा नसताना केवळ दरवाढ करणे म्हणजे सर्वसामान्यांची लूट असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
*जनआंदोलनाचा इशारा*:प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास प्रवाशांच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी एसटी प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.हे निवेदन देतेवेळी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत, तालुका प्रमुख संदेश नारगुडे, उपतालुका प्रमुख रितेश लोखंडे व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.



