रत्नागिरी: आजच्या डिजिटल युगात मुलांमधील मोबाईल आणि स्क्रीनचे वाढते आकर्षण पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. वाढत्या स्क्रीन वापरामुळे मुलांचा ‘अॅटेंशन स्पॅन’ (एकाग्रता) कमी होत असतानाच, त्यांना पुस्तकांच्या रंगीबेरंगी आणि अद्भुत विश्वाशी जोडण्यासाठी रत्नागिरीत एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘आनंदालय एक्स्पिरिअन्शल होमस्कूल’तर्फे खास मुलांसाठी ‘अक्षरबाग’ या नाविन्यपूर्ण बालग्रंथालयाची सुरुवात करण्यात येत आहे. या ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा येत्या १९ एप्रिल २०२६ रोजी, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.
मुलांमधील ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी ‘अक्षरबाग’मध्ये दीड वर्षांपासून ते १४ वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी वैविध्यपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. केवळ पुस्तक वाचनच नव्हे, तर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी येथे ‘स्ट्रक्चर्ड रीडिंग प्रोग्राम’ (Structured Reading Programmes) आणि विविध वाचनपूरक उपक्रमही राबवले जाणार आहेत. मोबाईलच्या आभासी जगापासून मुलांना दूर नेऊन अक्षरांच्या बागेत रमवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन अॅड. दीपक पटवर्धन (अध्यक्ष, स्वामी स्वरूपानंद पतसंस्था व नगर वाचनालय, रत्नागिरी) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे टेक्निकल डायरेक्टर श्री. रामबाबू संका उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा १९ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता, ‘मराठा भवन मंगल कार्यालय’ (तारांगणासमोर, रत्नागिरी) येथे पार पडणार आहे.
या नाविन्यपूर्ण बालग्रंथालयाचा लाभ रत्नागिरीतील जास्तीत जास्त पालकांनी आणि मुलांनी घ्यावा, असे आवाहन ‘आनंदालय एक्स्पिरिअन्शल होमस्कूल’च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९५२७९९४६५२ किंवा ९४०५९५७५१३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.



