रत्नागिरी : उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व शाळा सोमवारी गजबजून जाणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात १०,१२१ नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचा प्रवेशोत्सव आनंदाने साजरा करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शालेय इमारतींची दुरुस्ती, साफसफाई, रंगरंगोटी करून शालेय परिसराची सजावटही करण्यात आली आहे. त्यासाठी शनिवारी, रविवारी शिक्षक शाळेत तयारीच्या कामात व्यस्त होते. नवागतांच्या स्वागतानिमित्त स्वागत फेरी काढण्यात येणार आहे. शाळेच्या प्रवेशद्वारात मुलांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून, फूल देऊन व तोंड गोड करून स्वागत केले जाणार आहे.
………..
पहिल्याची दिवशी पुस्तके
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येते. जिल्ह्यातील १ लाख २७९ विद्यार्थ्यांना ६ लाख १३ हजार ३८९ पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत.
………
गणवेश, बूटही मिळणार
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे गणवेश वितरण करण्यात येतो. जिल्ह्यातील एकूण ६४,०२० विद्यार्थ्यांना प्रत्येक दोन गणवेश दिले जाणार आहेत. तसेच ६६,२८९ विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन पायमोजे जोडी उपलब्ध करून देण्यात येतात.



