रत्नागिरी: बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० लाख ५१ हजारांचे सोने आणि काही रक्कम चोरून नेल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीची ही घटना शहरातील साळवी स्टॉप येथील छत्रपती नगर येथे झाली असून मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला ही चोरी उघड झाली. याबाबत हसीना अन्वर काझी (६०, रा. छत्रपती नगर रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. हसीना काझी आपल्या कुटुंबासमवेत गेले आठ दिवस गावी गेल्या होत्या. याचाच फायदा घेत चोरट्याने त्यांचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली आहे. मंगळवारी सकाळी चोरी झाल्याचे कळतात अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि शहर पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण टीम दाखल झाली होती. या टीमने चोरट्यांचा शोध लावण्यासाठी शहरातील साळवी स्टॉप परिसरातील आणि अन्य परिसरातील उपलब्ध सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.
चोरट्यांनी शेजारच्या घराला लावल्या कड्या
ही चोरी सोमवारी मध्यरात्री झाल्याचा संशय आहे. चोरट्याने चोरी करण्यापूर्वी शेजारी असल्याने घरांना बाहेरून कडी लावून घेतली. जेणेकरून चोरीची चाहूल लागल्यास कोणी बाहेर येऊ नये त्यानंतर हसीना काझी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि चोरी करून मागील बाजूचा दरवाजातून पळ काढला.
आपण कुठे बाहेरगावी जाणार असाल तर आपले फोटो व्हिडिओ किंवा आपली माहिती सोशल मीडियावर अपलोड करू नका. जेणेकरून ही माहिती बघून अज्ञात व्यक्ती किंवा चोरटे आपल्या घरी येऊन घर फोडून जाऊ शकतात. तसेच आपल्या शेजारील नागरिकांना आपण बाहेरगावी जात आहात याची कल्पना देऊन ठेवा तसेच घरात मौल्यवान वस्तू दागिने पैसे ठेवू नका ते बँकेत लॉकरमध्ये ठेवा असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी नागरिकांना केले आहे.



