संगमेश्वर: मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या दिग्दर्शनाचा वेगळा ठसा उमटवणारे लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी यंदाचा माघी गणेशोत्सव आपल्या कोकणातील मूळ गावी अत्यंत उत्साहात साजरा केला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासे हे रवी जाधव यांचे गाव असून, कामाच्या व्यापातून वेळ काढत ते माघी गणेशोत्सवासाठी खास कोकणात पोहोचले होते. ‘मैं अटल हूं’, ‘ताली’, ‘बालक पालक’ आणि ‘टाईमपास’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या जाधव यांनी सोशल मीडियावर आपल्या गावच्या उत्सवाचे खास क्षण शेअर केले आहेत.
यामध्ये कोकणचे सौंदर्य दर्शवणारी कौलारू घरे, आंबा-सुपारीच्या हिरव्यागार बागा आणि गावातून वाजत-गाजत निघणारी गणपती बाप्पाची पालखी अशा लोभसवाण्या दृश्यांचा समावेश आहे. गावच्या मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेली दिव्यांची आरास आणि भक्तीमय वातावरणाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना जाधव यांनी स्पष्ट केले की, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी केवळ सुट्टी पुरेशी नसते, तर त्यासाठी गावची माती आणि बाप्पाचा सहवास आवश्यक असतो. माघी गणेशोत्सवातून मिळणारी ही ऊर्जाच वर्षभराच्या संघर्षात आपल्याला बळ देते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून, कोकणची संस्कृती जपणाऱ्या या दिग्दर्शकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



