रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात भरधाव होंडा सिटी कार चालवत एका तरुणाने सौ. सुनीता साळवी यांच्या अंगावरून वाहन नेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत सौ. सुनीता साळवी या गेली ३० वर्षे रत्नागिरी शहरात ब्युटी पार्लर व्यवसाय करत होत्या. रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिकांपैकी त्या एक होत्या. शहरात त्यांचे दोन ब्युटी पार्लर असून त्या अत्यंत नम्र, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू व मुलगी असा परिवार आहे.
या गंभीर अपघात प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिण यांच्या वतीने महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आज पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. भक्ती दळी, सौ. प्रज्ञा टाकळे, सौ. संगीता कवीतके, सौ. सारिका शर्मा, सौ. प्रीती शिंदे, सौ. सोनाली केसरकर तसेच सौ. मुक्ता बाष्ट्ये उपस्थित होत्या. महिला मोर्चाच्या वतीने शहरात वाढणाऱ्या भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई, रस्ते सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि अपघातग्रस्त कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची ठाम मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.



