रत्नागिरी: येत्या १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना’चा अधिकृत लोगो रविवारी प्रसिद्ध करण्यात आला. कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना शिल्पाताई सुर्वे म्हणाल्या की, “ग्रामीण जीवन, कृषी क्षेत्र आणि सहकार चळवळ हे महाराष्ट्राचे कणा आहेत. या तिन्ही विषयांना एकत्रित करून साहित्याच्या व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत आहे. हे संमेलन ग्रामीण भागातील समस्या आणि यशाचे दर्शन घडवणारे ठरेल.” या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिल्पाताई सुर्वे यांची रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संमेलन संयोजन समितीच्या वतीने त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मालगुंड गावच्या सरपंच श्वेता थेऊर, संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण आणि कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



