नागरिकांनी घाबरुन गॅस एजन्सीपुढे रांगा न लावण्याचे आवाहन
रत्नागिरी: युध्दजन्य परिस्थितीमुळे ‘एलपीजीचा’ तुडवडा होतो कि काय असा गैरसमज करुन रत्नागिरीतील नागरिक गॅस एजन्सीमध्ये मोठ-मोठ्या रांगा लावत आहेत. परंतू रत्नागिरी जिल्ह्यात एलपीजीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर नागरिकांना मिळण्यात कोणतीही अडचण नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळण्यात काही अडचणी असून शासन त्याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार आहे. नारिनिकेतन,शाळा,हॉस्पिटल यांना गॅस साठा मुलबक प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी देखील उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि,नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळणार नसल्याच्या गैरसमजातून गॅस एजन्सीपुढे रांगा लावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन करु नये. घरगुती गॅस सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात असल्यामुळे सर्वांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. गॅस सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग सध्या थांबवण्यात आल्यामुळे त्याबाबत शासनाची मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर ऑनलाईन बुकिंग सुरळित होणार आहे. रत्नागिरीतील जयगड बंदरात गॅसचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. आणि वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शनानूसार तो साठा नागरिकांपर्यंत पोहचणार आहे.
इतर जिल्ह्यांमध्ये गॅस एजन्सीच्या ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी ज्ािल्ह्यात तसा प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून पेट्रोलिंग सुरु असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आलेला आहे. ऑनलाईन बुकिंचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण डीएसओ आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचेही नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



