Monday, March 16, 2026

Latest Posts

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व; अस्मिता केंद्रे यांच्या रूपाने मंडणगडला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाले अध्यक्षपद

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातील शिवसेनेच्या विजयी उमेदवार अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी पहिल्यांदाच मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदेचे सर्वोच्च अध्यक्षपद मिळाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज या नावांची अधिकृत घोषणा केली.

शिवसेनेची एकहाती सत्ता आणि महायुतीचा विजय
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ५६ जागांपैकी शिवसेनेने ४१ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत शिवसेनेने ४६ उमेदवार उभे केले होते, त्यापैकी ४१ जणांनी विजय मिळवला.

पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण भैया सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली शिवसेनेने ही मोठी घौडदौड केली आहे. भाजपला ४ जागा मिळाल्या असून, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने ५ जागा जिंकल्या आहेत. यामुळे महायुतीचे संख्याबळ ५० वर पोहोचले असून जिल्हा परिषदेवर भगवा फडकला आहे.

अनुभवी नेतृत्व: अस्मिता केंद्रे आणि विलास चाळके
अस्मिता केंद्रे (अध्यक्ष): महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या पदासाठी अस्मिता केंद्रे यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील भिंगळोली गटातून त्या विजयी झाल्या आहेत. त्या अनुभवी सदस्य असून, यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाही जिल्हा परिषदेत उत्तम कामगिरी केली होती. वर्षभरापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला होईल, या विश्वासाने ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विलास चाळके (उपाध्यक्ष): उपाध्यक्षपदी वर्णी लागलेले विलास चाळके हे पालकमंत्री उदय सामंत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. काही वर्षांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. संघटन कौशल्य आणि प्रशासकीय कामाची जाण यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे.

सव्वा वर्षाचा कालावधी आणि भविष्यातील रणनीती
पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेतर्फे नवनियुक्त अध्यक्षांना सव्वा वर्षाचा (१५ महिने) कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला जाईल. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातून पहिल्यांदाच अध्यक्ष मिळाल्याने मंडणगड आणि दापोली परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.