रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे या मुख्य मार्गावरील दरड प्रवण क्षेत्रांची स्थिती अत्यंत भयावह झाली असून, येणाऱ्या पावसाळ्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच मिरजोळे येथे गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खचून मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ‘युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.युवासेना प्रमुख आदरणीय श्री. आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेना सचिव श्री. विनायक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी नुकताच तालुक्यातील बाधित गावांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात चांदेराई, कुरतडे आणि मिरजोळे भागातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
पाहणी दौऱ्यात समोर आलेली भीषण वास्तवता:
*चांदेराई-कुरतडे मार्गावर धोका*: या मुख्य रस्त्यावरील डोंगराचे भाग खचले असून स्थिती अत्यंत गंभीर आहे. पावसाळ्यापूर्वी येथे तातडीने उपाययोजना न केल्यास वाहतूक ठप्प होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते.
*मिरजोळेत शेतजमिनींचे नुकसान*: अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे मिरजोळे येथील शेतकऱ्यांच्या बागायती व शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आर्थिक मदत मिळालेली नाही.
*युवासेनेचा आक्रमक पवित्रा*: पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. प्रशासनाने चांदेराई-कुरतडे मार्गाची तांत्रिक पाहणी करून तिथे संरक्षक भिंती उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे. तसेच मिरजोळेतील शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी केली आहे. प्रशासनाने यावर त्वरित पावले न उचलल्यास जनसामान्यांच्या हक्कासाठी युवासेना रस्त्यावर उतरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या दौऱ्यात जिल्हाप्रमुखांसह तालुका प्रमुख संदेश नारगुडे, विभाग प्रमुख अथर्व गांगण आणि निवेदन सादरीकरणाच्या वेळी युवासेनेचे उपतालुका प्रमुख रितेश लोखंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



