रत्नागिरी: भारत आणि पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्याला मोठा समुद्रकिनारा असल्याने त्या बाजूने धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन सागरी गस्तीवर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी लगेचच सुरू करण्यात आलेली आहे. पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना सणसणीत उत्तर देत गुरुवारी रात्री भारताने पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर हल्ला केला. या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद सर्वत्र विशेषतः किनारपट्टी भागात उमटू शकतात हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्याला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन किनारपट्टी भागात विशेष लक्ष दिले जात आहे. सतर्कतेच्या सूचनांच्या वृत्ताला जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही दुजोरा दिला. मुळातच रत्नागिरी जिल्ह्यात सागरी पोलिस स्थानके आहेत. त्यांच्या जोडीला इतर भागातील पोलीसही दिले जात आहेत आणि सागरी क्षेत्रातील गस्तीवर सध्या विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी मच्छीमार आणि सागरी रक्षक दलाचीही मदत घेतली जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रवेशद्वारांवरील तपासणी नाके तसेच अंतर्गत मार्गावरील तपासणी नाकेही सत्र ग ठेवण्यात आले आहेत. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे असे ते म्हणाले. पोलिसांच्या मदतीसाठी जागोजागी होमगार्डे देण्यात करण्यात आले आहेत. सागरी क्षेत्रासाठी रेड अलर्ट असल्याने त्या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सर्व अधिकारी या बंदोबस्ताकडे लक्ष ठेवून आहेत असेही ते म्हणाले.
पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
सध्याची तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच अधिकारी व कर्मचारी कामावर हजर आहेत. जिल्ह्यात सर्वच भागात पोलिसांची करडी नजर आहे आणि यात सर्वसामान्य लोकांकडून ही पोलिसांना सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले
भारताने पाकिस्तानवर हल्लाबोल केल्यानंतर देशात तणावाचे वातावरण आहे लोकांमध्ये जोशी अधिक आहे मात्र समाज माध्यम हा जो व्यक्त करताना इतर कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यावी.
– धनंजय कुलकर्णी पोलिस अधीक्षक रत्नागिरी