Sunday, June 8, 2025

Latest Posts

खाकीचा धर्म पाळून एकोप्यासाठी प्रयत्न : नितीन बगाटे

रत्नागिरी : आमचा धर्म खाकी हाच आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाताना एकोप्यासाठी प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य करणार असे प्रतिपादन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यांतर्गत सामाजिक सलोखा समिती सदस्यांचा परिचय बैठकीत केले. पोलीस अधीक्षक बगाटे यांचा संकल्पनेतून जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्थानकांतर्गत  सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात येत आहेत. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकांतर्गत समितीचा सदस्यांची येथील दैवज्ञ भवन येथे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक शिवप्रसाद पारवे, रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर उपस्थित होते. प्रारंभी पोलीस अधीक्षक बगाटे यांचा जयदीप परांजपे यांनी परिचय करून दिला. मनोगतात बगाटे म्हणाले की, कोकणातील लोक प्रगल्भ शांतताप्रिय आहेत. त्यामुळे बळाचा वापर करण्याची गरजच नाही अशा शांततापूर्ण भागाला शांत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पोलीस आणि समाज यातील दरी दूर व्हावी या उद्देशाने सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात येत आहेत असे ते म्हणाले. सोशल मीडिया वरून वार केले जात आहेत त्यातून सामाजिक एकोप्याला  धोका पोहोचत आहे मात्र खाकीचा धर्म पाळून प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य करू असेही ते यावेळी म्हणाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी केले. सूत्रसंचालन पूर्व पेठे यांनी केले. यावेळी पोलीस पाटील बोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा एनएसएस विभागाचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.