रत्नागिरी : उत्कृष्ट नियोजन, लहान वयात संस्कारक्षम बनवणारे उपक्रम, विविध खेळ आणि यांसह वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव देणारे असे उन्हाळी शिबिर होते. यात मुलांनी धमाल मस्ती करतानाच अनेक चांगल्या गोष्टीही शिकल्या याचे समाधान आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या.
निमित्त होते ते नगरपालिकेचा महिला व बालकल्याण समिती उपसभापती आणि नगरसेविका पूजा दीपक पवार यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर येथे लहान मुलांसाठी आयोजित उन्हाळी शिबिर समारोपाचे. राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि नगरसेवक प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिरात मजेदार खेळ, एरोबिक्स, चित्रकला, डान्स, वाळू शिल्प असे विविध प्रकारचे उपक्रम या घेण्यात आले. यांमधून मुलांना खूप अनुभव घेता आले. श्रीकांत ढालकर यांनी दाखवलेला बोलक्या बाहुल्यांचा खेळ हा शिबिराचे विशेष आकर्षण ठरले. या खेळाबरोबच त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढून दाखवत मुलांना एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणली. या शिबिरात वाळू शिल्प साकारण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, समुद्री घोडा आणि गणपतीचे वाळू शिल्प यांचा समावेश होता.
आज ५ ते ८ मे या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले. यात चारही दिवशी शिबिराची सुरुवात सकाळी मुलांना श्लोक, प्रार्थना, बोधकथा यांनी करण्यात आली. त्यानंतर मुलांना चित्रकला, वाळूशिल्प, बोलक्या बाहुल्यांचा खेळ, याबरोबरच संरक्षणाचे धडे देण्यात आले. आजच्या शेवटचा दिवशी सर्व मुलांना बक्षीस देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट आजी म्हणून प्राजक्ता प्रताप मांगले, उत्कृष्ट आजोबा म्हणून विनायक यशवंत ताम्हणकर, उत्कृष्ट आई म्हणून माऊली इंद्रनील नाखरे, तर उत्कृष्ट बाबा म्हणून सागर नंदकिशोर साखरकर यांना पारितोषिके देण्यात आली.
शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, वैभवी खेडेकर, सायली पाटील, दामले शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोटे, दामले विद्यालयाचे शिक्षक श्री पाटील, दत्तप्रसाद कुलकर्णी, शेखर लेले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसांचे वितरण झाले.
गेले चार दिवस हे शिबिर संपन्न होण्यासाठी काव्या कामतेकर, अंजली सावंत, शरयू पेडणेकर, तेजल पाटील, राधा झोरे, भाग्यश्री सपकाळ, योगिता खांडेकर, स्मिता पाटोळे, सुनील शिवलकर, यश पवार, श्रीयोग चव्हाण, शौर्य मांजरेकर, राजस वने, रोहित शिंदे, प्रणित चिले, जितेंद्र मोडक वेदांत सावंत यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता कोकजे आणि वैशाली कुडाळकर यांनी केले.







