हजारो रत्नागिरीकरांचा सहभाग; ‘वॉक फॉर वॉटर’ने दिला जल व मृद संवर्धनाचा संदेश
रत्नागिरी. : “पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया,, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया” असा दृढ संकल्प करत रत्नागिरी शहरात आज जलसंधारण दिनानिमित्त भव्य ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उत्साहात पार पडली. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या ३ किलोमीटरच्या महावॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या हजारो प्रतिनिधींनी एकत्र येत जलजागृतीचा संदेश दिला.
सकाळच्या आल्हाददायक वातावरणात शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ चौकात हे ससभागी जमले होते. महावॉकेथॉनच्या सुरुवातीला प्रशिक्षक सानिका चव्हाण हिने सर्वांकडून उत्साही संगीताच्या तालावर झुम्बा करत वॉर्मअप करुन घेतला. त्यानंतर उपस्थितांनी निसर्गाची अमूल्य देणगी असलेले पाणी आणि माती वाचवण्यासाठी, तसेच भूजल पुनर्भरण आणि जलसंधारणात सक्रिय योगदान देण्याची सामूहिक शपथ घेतली.
मी महाराष्ट्राचा सुजाण व जागरुक नागरिक म्हणून, आज अशी शपथ घेतो/घेते की, माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे, याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबध्द राहीन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन, पाण्याचा अपव्यय टाळेन आणि पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेन.
पाणलोट विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईन व इतरांनाही प्रेरित करीन. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जलसमृध्द, दुष्काळमुक्त व शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईन.
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, मृद व जल संधारण कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला प्रारंभ केला.
जयस्तंभ चौक ते माळनाका आणि पुन्हा जयस्तंभ चौक अशा मार्गाने ही पदयात्रा आली. यामध्ये महाविद्यालयीन तरुण, एनएसएस, एनसीसी कॅडेट्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शासकीय आधिकारी-कर्मचारी यांचा मोठा सहभाग होता. पदयात्रेच्या सांगतेनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाला जलदूत वल्लभ वणजू, राजू भाटलेकर, नगरसेवक सुहेल मुकादम, फैयाज मुकादम, गणेश धुरी आणि सुमित ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री साहुत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचलन अभियंता आकांक्षा साळवी हिने केले.
मृद व जल संधारणचे उप अभियंता अनिकेत शिरगावकर, संकेत शेट्ये, धनश्री मिसाळ, प्रमोद जाईल, कनिष्ठ अभियंता मंथन कांबळे, राजेश चिखलकर आदींचा नियोजनात सहभाग होता. जल आणि मृद संवर्धनाची ही लोकचळवळ अशीच पुढे नेण्याचा निर्धार यावेळी रत्नागिरीकरांनी व्यक्त केला. पटवर्धन हायस्कूल, दामले हायस्कूल, जीजीपीएस, फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज, फाटक हायस्कूल, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता.



