रत्नागिरी: जिल्ह्यात घरोघरी आगमन झालेल्या लाडक्या गणरायाचा व त्या मागोमाग आलेल्या गौराईचा भक्तिमय वातावरणात पाहुणचार झाल्यानंतर २ सप्टेंबर रोजी निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक गणपतीचे विसर्जन होणार असून समुद्रकिनाऱ्यावर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील भाटे व मांडवी किनारी गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्रशासनाने पोलीस पाटलांनाही सूचना दिले आहेत. शहरातील मांडवी या समुद्रकिनारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. मांडवी समुद्रकिनारी पोलिसांची करडी नजर असणार आहे. गणपती विसर्जन येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.



