“काम करताना स्वतःच्या जीवाची आणि सुरक्षिततेची काळजी घ्या; आमदार किरण सामंत यांच्याकडून कर्मचाऱ्यांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस
एवढा सहनशील आमदार आम्ही उभ्या आयुष्यात पाहीला नाही; महावितरणच्या कर्मचाऱ्यांची भावनिक साथ
✍🏻लांजा : लांजा-राजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटणे, विजेचे पोल कोसळणे, झाडे पडणे अशा घटना घडल्याने अनेक गावे अंधारात गेली आहेत. या परिस्थितीत जनतेला तातडीने दिलासा मिळावा यासाठी आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला तातडीच्या सूचना देत महावितरण यंत्रणा कामाला लावली आहे.*
आमदार किरण सामंत यांच्या आदेशानंतर राजापूर आणि लांजा विभागातील महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून, दुर्गम भागात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मुसळधार पाऊस, चिखल, अंधार आणि धोकादायक परिस्थितीतही कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी स्वतः विविध ठिकाणी भेट देत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तुटलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्त करणे, पडलेले पोल उभे करणे, झाडांच्या फांद्या हटवणे आणि बंद असलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी महावितरण कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले. उन्हात, पावसात आणि अंधारात सतत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. *तसेच “काम करताना स्वतःच्या जीवाची आणि सुरक्षिततेची काळजी घ्या. जनता तुमच्याकडून मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, मात्र तुमचे आरोग्य आणि सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची आहे,” अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली.*
आमदारांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. *“फक्त आदेश देणारे नव्हे तर प्रत्यक्ष फिल्डवर येऊन कामाची पाहणी करणारे आणि कर्मचाऱ्यांची विचारपूस करणारे आमदार आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. उभ्या महाराष्ट्रात असा लोकाभिमुख आमदार पाहायला मिळणे दुर्मिळ आहे,” अशा भावना यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.*
वादळी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात आमदार किरण सामंत यांनी घेतलेली धाव, प्रशासनाशी साधलेला समन्वय आणि सामान्य जनतेसह कर्मचाऱ्यांप्रती दाखवलेली संवेदनशीलता यामुळे नागरिकांकडूनही त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. लांजा-राजापूर तालुक्यातील अनेक भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा अजूनही युद्धपातळीवर कार्यरत असून, लवकरात लवकर सर्व गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



