रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुरामपंत अभ्यंकर बालकमंदिरात बालवारकऱ्यांचा उत्साहपूर्ण दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात खेळघर, छोटा शिशूगट आणि मोठा शिशूगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषात सहभाग घेतला.
चिमुकल्या बालवारकऱ्यांनी टाळ, मृदुंग, भगवे झेंडे, तुळशीची रोपे आणि विठ्ठलनामाचा गजर करत परिसर भक्तिमय केला. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या निरागस सहभागामुळे दिंडी सोहळ्याला विशेष रंगत आली.
या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा, संस्कार, भक्ती आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा उद्देश होता. मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी शिक्षिका व ताईंनी दिंडी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे अभिनंदन केले.



