रत्नागिरी:
शनिवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधत इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन टाळांच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात शाळेपासून बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर पर्यंत पायी दिंडीचा अनुभव घेतला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पाटणकर मॅडम यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेची पूजा करून दिंडीला प्रारंभ करून दिला.विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करत परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.तसेच इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यानी शिरगांव विठ्ठल मंदिर व कुवरबाव विठ्ठल मंदिर येथे भजन सेवा सादर करून आपली सेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली. इयत्ता नववी व दहावीच्या मुलांनी स्वयंसेवकांच्या भूमिकेतून या उपक्रमाला मदत केली.
विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संस्कृती यांची ओळख होणे हाच या उपक्रमाचा उद्देश असतो.
संपूर्ण उपक्रम गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जी.जी.पी.एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडला.



