पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
रत्नागिरी:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुका कार्यालय व युवासेना यांच्यावतीने आदर्श हायस्कूल, कुरतडे येथे भव्य चित्रकला आणि हस्तकला (मातीकाम) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा काल उत्साहात संपन्न झाली असून, या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत, तालुका प्रमुख श्री. संदेश नारगुडे, युवासेना कार्यकर्ते विजय जाधव आणि सार्थक आंग्रे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजल शरद फुटक (इयत्ता ९ वी), द्वितीय क्रमांक मानवी महेश पवार (इयत्ता ८ वी), तृतीय क्रमांक अनुष्का अविनाश फुटक (इयत्ता १० वी) आणि उत्तेजनार्थ प्रज्वल प्रकाश बिर्जे (इयत्ता ८ वी) यांनी पटकावला. तसेच हस्तकला (मातीकाम) स्पर्धेत प्रथम क्रमांक आयुष पांडुरंग करसोडे (इयत्ता १० वी), द्वितीय क्रमांक वेदीका निलेश साळवी (इयत्ता १० वी) आणि तृतीय क्रमांक नंदीनी महेश पालवकर (इयत्ता १० वी) यांनी मिळवला.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे हाच युवासेनेचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश मांडवकर सर यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये अशा स्पर्धांचे आयोजन वारंवार होणे गरजेचे असल्याची आग्रही विनंती केली. ग्रामीण भागात प्रतिभेची कमतरता नाही, मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापकांच्या या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी त्यांना शब्द दिला की, युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील तळागाळातील आणि दुर्गम भागातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. पुढे बोलताना सावंत म्हणाले की, युवासेना केवळ स्पर्धांपुरती मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे जतन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी दूर करणे यासाठी युवासेना सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील मुलांचा उत्साह पाहून उपस्थितांनी रत्नागिरी तालुका कार्यालय आणि युवासेनेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.



